स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे हे महाराष्ट्र राज्याचे वैभव आहे. नारळाच्या झाडांनी बहरलेले प्रसन्न समुद्र किनारे, मऊ, रेशमी वाळू, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा पाहत आणि समुद्राची गाज ऐकत निवांत वेळ घालवायचा असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रात अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.
रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे ठिकाण विशेषत: थंडीच्या दिवसांत पर्यटकांनी गजबजून जाते. या किनाऱ्यावर अनेक स्थलांतरित पक्षी सुद्धा पाहायला मिळतात.
निसर्गरम्य समुद्र किनारा आणि बोटींग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग अशा विविध साहसी खेळांमुळे तारकर्ली हे देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते आहे. इथल्या स्कूबा डायव्हिंग केंद्राला भेट देऊन समुद्रातील पाण्याखालच्या अद्भूत विश्वाची सफरही तुम्ही करू शकता.
स्वच्छ समुद्र किनारा लाभलेले श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव. या ठिकाणी तुम्हाला अनेक पेशवेकालीन वास्तू आणि मंदिरे पाहता येतील.
चंद्रकोरीच्या आकाराचा आणि नारळी-पोफळीच्या बागांनी वेढलेला वेळणेश्वर किनारा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथल्या मऊशार वाळूच्या किनाऱ्यावर तुम्ही कुटुंबासह सहलीचा आनंद घेऊ शकता.
डहाणू-बोर्डी किनारा हे डहाणूमधील पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. समुद्र किनाऱ्याबरोबरच चिकू आणि इतर फळांच्या बागांसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
पांढरी वाळू हे गणपतीपुळे इथल्या समुद्र किनाऱ्याचे खास वैशिष्ट्य. त्याचबरोबर तब्बल ४०० वर्ष जुने स्वयंभू गणपती मंदिर हे पर्यटक आणि भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
हर्णे आणि मुरुड ही दोन टुमदार शहरे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. हर्णे समुद्रकिनारा हा मच्छीमारांसाठी मोक्याचे ठिकाण आहे तर मुरूड येथे अनेक जलतरणपटू सरावासाठी येत असतात.
प्राचीन मंदिरे, नारळी-पोफळीच्या आणि सुपारीच्या बागा, हापूस आंबे यासाठी प्रसिद्ध असलेले गुहागर हे कोकणचे वैभव आहे. शहराच्या मध्यभागी, आपल्याला १२ व्या शतकातील शिव मंदिर, व्याडेश्वर अशी प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेपासून १७ कि.मी. अंतरावर असणारा शिरोड्याचा समुद्र हा रम्य वातावरण आणि निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्यालगतच तुम्हाला नारळी पोफळीची शेकडो झाडे दिसतील.
वेंगुर्ला येथील रमणीय समुद्रकिनारा हे या शहराचे वैभव आहे. इथल्या स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, स्कूबा डायव्हिंग, मासेमारी असे अनेक अनुभव घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.
सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या मुखावर हरिहरेश्वर हे गाव वसले आहे. डोंगर रांगा आणि मंदिरांनी वेढलेला हा परिसर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
थंडगार वारा, फेसाळत्या समुद्राच्या लाटा, नारळी पोफळीच्या बागा आणि सोबत कोकणी खाद्यपदार्थांची मेजवानी हे समीकरण वेळासमध्ये अगदी सहज जुळून येते. दुर्मिळ ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांमुळे वेळासला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली आहे.
वर्षभर प्रसन्न आणि सुखद वातावरण हे किहीमचे वैशिष्ट्य. समुद्रात मोटारबाईकिंग, पॅराग्लाइडिंग, बनाना राईड असे साहसी खेळ येथे अलीकडेच खूप प्रसिद्ध झाले आहेत.
मालवणमधील तारकर्ली हा पर्यटकांचा सर्वात जास्त आवडता समुद्र किनारा आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. स्वच्छ समुद्र किनारा, पामची हिरवीगार झाडे आणि उत्कृष्ट चवीचे स्थानिक भोजन यामुळे तारकर्लीला पहिल्यांदाच येणाऱ्या पर्यटकांची पावले पुन्हा पुन्हा या ठिकाणाकडे हमखास वळतात.
तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अक्वेटिक स्पोर्ट्स - IISDA हा भारतातील जागतिक दर्जाचा उपक्रम आहे. डायव्हिंग केंद्र आणि निवासासाठी रिसॉर्ट अशा दोन्ही सुविधा असल्याने साहसी तरुणाई सोबतच कौटुंबिक सहलीसाठी सुद्धा हे ठिकाण अगदी उत्तम ठरते.
२०२० साली नाशिक येथील एमटीडीसी बोट क्लबचे उद्घाटन झाले आणि अल्पावधीतच ते पर्यटक आणि स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. राज्याच्या विविध भागातून आलेले विविध वयोगटातील पर्यटक या ठिकाणी मनापासून रमलेले दिसतात.
जेट स्की पासून पॅरासेलिंगपर्यंत आणि कयाकिंगपासून लेक क्रूझपर्यंत सागरी पर्यटनाचे अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या बीच शॅक वर समुद्राचे सुंदर देखावे बघत संध्याकाळ घालवण्याचा आकर्षक पर्यायही उपलब्ध आहे.